संदीप फाऊंडेशनच्या विद्यार्थिनीची खासगी वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या
पंचनामा न्यूज नाशिक : (प्रतिनिधी)
धुळे जिल्ह्यातील १७ वर्षीय विद्यार्थिनीने नाशिकमधील खाजगी वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंजली कैलास बागुल (वय १७, रा. नवीन नगर, धुळे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नाशिक येथील संदीप फाऊंडेशनमध्ये शिक्षण घेत असून खाजगी वस्तीगृहात राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली हिने वस्तीगृहाच्या पहिल्या मजल्यावरील तिच्या खोलीत स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच वस्तीगृहातील कर्मचारी व इतर विद्यार्थिनींनी तिला तातडीने खाली उतरविले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून तिच्या कुटुंबीयांसह वस्तीगृह व्यवस्थापन आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून आत्महत्येचे कारण शोधण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments